सफरचंद मूळ बर्फाळ प्रदेशात पिकणारे एक फळ आहे. यापूर्वी सफरचंद भारताच्या उत्तर दिशेतील काही राज्यांमध्ये, उदाहरणार्थ जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश व उत्तराखंड मध्ये पिकत असत. आता महाराष्ट्राच्या मातीत देखील सफरचंद पिकवणे शक्य आहे. आमच्या आजच्या या बातमी मागे प्रेरणादायी गोष्ट आहे एका शेतकऱ्याच्या प्रयोगाची आणि खूप सार्या मेहनतीची. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटले असेल की बर्फाळ प्रदेशात पिकणारे हे फळ चक्क दुष्काळी भागात कसे काय?
काश्मीर मधील सफरचंद पिकणार महाराष्ट्रात
महाराष्ट्रात दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा येथील उस्मानाबाद जिल्ह्यातली ही गोष्ट आहे. ही अभूतपूर्व किमया जागजी गावातील एका मराठमोळ्या शेतकऱ्यानी साध्य करून दाखविली आहे. हा आगळा वेगळा प्रयोग राम सावंत यांचा आहे. आपल्या ड्रॅगन फ्रुट च्या बागेत त्यांनी सफरचंदाचे आंतरपीक घेतले आणि सावंत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. आकाराने लहान असणारे उस्मानाबाद मधील हे सफरचंद गोड व रसाळ आहेत. सावंत यांच्या मते एका झाडापासून त्यांना अडीचशे ते तीनशे फळ मिळणे अपेक्षित आहे. सफरचंद दिसायला लालबुंद व खायला चवदार आहेत असे हे शेतकरी सांगतात.
सफरचंदाचं आंतरपीक घेऊन आखली अनोखी नफा योजना
येत्या आठ ते दहा दिवसात हे सफरचंद उतरून ते बाजारात विकण्यास नेतील. विशेष म्हणजे दुष्काळी भागात पाणी टंचाई असताना देखील इतके सुंदर उत्पादन प्रथमच पाहायला मिळाले. आपल्या तीन एकर शेतीमध्ये सावंत परिवाराने काही वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली होती. काही काळानंतर प्रयोग म्हणून सावंत यांनी सफरचंदाचे आंतरपीक घेण्याचे ठरविले. व्हिएतनाम वरून सफरचंदाची शंभराहून अधिक पिके आणण्यात आली व अतिशय कष्ट आणि परिपूर्ण नियोजन करून त्यांनी आपले ध्येय साध्य केले. या फळबागेतुन सावंत कुटुंबाला सुमारे दोन ते अडीच लाख इतके पैसे मिळणे अपेक्षित आहे. उस्मानाबाद मधील ही सफरचंदाची बाग जणू कश्मीर दर्शन घडवते. अशाच शेती विषयक प्रेरणादायी गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचत रहा आपली मायबोली…माझी भाषा माझा अभिमान!
Comment here